Skip to main content

समाजसेवा, समाजकारण या गोंडस नावाखाली आपल्या समाजातील तरूणांकडून होणारी चमचेगिरी व चमकोगिरी आणि त्याचे स्वरूप.


सध्याच्या वर्तमान राजकारणात कार्यकर्त्याची असलेली अवस्था.

पुर्वी अज्ञानी व देवभोळे लोकं देवाधर्माचे भक्त असायचे. परंतु आज आपल्या समाजातील तरुण आपल्या आसपासच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा भक्त झाला आहे. आसपासचे आमदार, खासदार, पंचायत समित्यांचे सभापती, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, गल्लीबोळातील नेते, कार्यकर्ते, 'आमचे आण्णा', 'आमचे भाऊ', 'आमचे मित्र', 'हमारे भय्या', 'उभरतं नेतृत्व', खंबीर नेतृत्व यांचा तो भक्त झाला आहे. सोशल मीडियावर तर अशा भक्तांचा अक्षरशः उत आलाय. ना विचार, ना ध्येय, ना कोणत्या गोष्टीचे यथोचित ज्ञान, ना स्वाभिमान. यापैकी जवळ काहीच नसताना समाजातले तरुण कुणाचे ना कुणाचे भक्त होऊन सोशल मिडीयावर चमकोगिरी आणि चमचेगिरी करताना सर्रासपणे दिसून येत आहेत.

ही परिस्थिती केवळ एक-दोन गावची तालुक्याची, जिल्ह्याची किंवा विशिष्ट अशा एका जातीतल्या तरूणांची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची, देशाची आहे. सर्वत्रच ह्या अशा अंधभक्ताचाच सुळसुळाट झाला आहे. ही भक्त मंडळी समाजकार्याच्या नावावर चमकोगिरी करत असतात. हीच त्यांची समाजसेवा. समाजसेवेचं गोंडस नाव देऊन ही भक्तमंडळी हुजरेगिरी व चमकोगिरी सध्या मोठ्या प्रमाणात करताहेत आणि त्यांच्या या प्रकारास आपले खेड्यापाड्यातील अज्ञानी, अशिक्षित, अर्धशिक्षित समाजबांधव बळी पडत आहेत. ही फार मोठी शोकांतिका आहे.

ज्या लोकांना नेता, नेतृत्व व समाजसेवा म्हणजे काय हे किंचितही माहित नाही. अशी अक्कलशुन्य लोकं आजकाल स्वतःला नेते म्हणवून मिरवित आहेत. दोन खादीचे पांढरे ड्रेस, गळ्यात एखादं सोन्याचं लॉकेट, हाताच्या बोटात अंगठ्या, चष्मा,  कपाळावर आडवे-उभे गुलालाचे पट्टे मारून, हात वर करून फोटो काढायच्या आणि त्या फोटो फेसबुक, व्हाट्सएप सारख्या सोशल मीडियावर येऊन मोठमोठ्या गोष्टी लिहून टाकायच्या, मोठ्या लोकांच्या, राजकारण्यांच्या पुढे पुढे करून, त्यांची हुजरेगिरी करून, त्यांच्या वाढदिवसाला हारतुरे घेऊन जाऊन, त्यांची गुलामी करून ओळखी करून घ्यायच्या अन् त्यांच्या सोबत फोटो काढून घेऊन त्या फेसबुक व अन्य माध्यमावर टाकायच्या. फेसबुकवर तासनतास रिकाम्या लोकांच्या लाईक्स, कमेंट्स मिळवायच्या, ऐकमेकांचे बळच वाढदिवसं साजरे करायचे. अशाप्रकारचे अतिशय भिकारचोट प्रकार करायचे. हीच यांची समाजसेवा. हीच त्यांची नेतागिरी. हीच त्यांची "हाक तुमची साथ आमची".

यातील अत्यंत विशेष बाब म्हणजे हा वरील सर्व खटाटोप समाजसेवेसाठी नसून स्वतःच्या स्वार्थासाठी व स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी असतो. भोळ्या-भाबड्या आशेने, स्वार्थी भावनेने, राजकारणात आपल्या हाती काही ना काही लागेल म्हणून, कुठेतरी, केव्हातरी मलिदा खायला भेटेल म्हणून समाजसेवेच्या नावाखाली आजचा तरुण भरकटत चालला आहे व दिशाहीन झाला आहे. त्याला आपल्याप्रती, कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदारीचा विसर पडत चालला असून तो इतरांचं पाहून राजकारणाच्या मायाजालात फसत चालला आहे. ज्या राजकारणात बोटावर मोजता येतील एवढ्या लोकांचा उद्धार झाला आहे आणि लाखो लोक यामुळे अक्षरशः उघड्यावर आले आहेत. अशा राजकारणात आजचा तरुण कूठल्याही अक्कलशुन्य माणसाच्या नादी लागून आपले भविष्य उद्ध्वस्त करून घेत आहे. 

तसे राजकारणात येणे वाईट नाही. बाबासाहेब म्हणतात, "आपल्या उच्चशिक्षित, बुद्धीजीवी तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. जर बुद्धीजीवी वर्ग राजकारणापासून दूर राहीला तर अयोग्य व अज्ञानी लोक तुमच्यावर राज करतील". पुढे बाबासाहेब असेही म्हणतात की, तरूणांनी सार्वजनिक जीवनात येण्याअगोदर स्वतः उच्चशिक्षित व्हावे, स्वावलंबी व्हावे आणि स्वतःप्रती असलेल्या जबाबदाऱ्या प्रथमतः पार पाडाव्यात आणि नंतरच राजकारणात यावे व समाजास योग्य ती दिशा द्यावी".

आता बाबासाहेबांच्या या विचाराला अनुसरून आजच्या परिस्थितीचा विचार केला तर आजची परिस्थिती या विचाराच्या अगदी उलट आणि विपरीत आहे. आजचा तरुण उच्चशिक्षित होणे तर दूरच राहीले, परंतु तो चांगला शिक्षितही नाही. त्याला समाजाप्रती तळमळ कमी आणि स्वतःप्रती जास्त आहे, त्याच्यात शासक व्हायची लायकी नसून तो गुलाम होण्याच्या लायकीचा आहे. तो स्वतःच दिशाहीन आणि गोंधळलेला असून तो समाजाला दिशा देऊ शकेल एवढं सामर्थ्य त्याच्यात नाही. त्याच्यात राजकारणाविषयीची जागृती ही समाजाचे दुख, वेदना पाहून आली नाही तर त्याच्यात ही जागृती इतरांचं पोझिशन, इतरांचं समाजातलं वर्चस्व, इतरांची आर्थिक स्थिती, गाड्या, घोड्या ह्या भौतिक गोष्टी पाहून अत्यंत स्वार्थी भावनेने ही जागृती आली आहे. याच भावनेने तो राजकारणात येत आहे. राजकारणात येण्याचा त्याचा आधारच अत्यंत कच्चा आहे. अशी सारी एकूण परिस्थिती आहे. याच स्वार्थी भावनेने आजकाल लोक राजकारण करत आहेत. त्यांना समाजाचं, समाजातील तरुणांच्या भविष्याचं कसलही देणेघेणे नसून ते आपला स्वार्थ साधण्यासाठी, पक्ष वाढविण्यासाठी, स्वतःचा जयजयकार करवण्यासाठी, स्वतःचा उदोउदो करवून घेण्यासाठी तरूणांना नादी लावत आहेत. यास मोठमोठ्या नेत्यापासून ते गल्लीबोळातील नेते, कार्यकर्ते कोणीही अपवाद नाहीत. फक्त आणि फक्त याच स्वार्थापोटी तो समाजसेवेच्या नावाखाली समाजकारण, राजकारण करत आहे. म्हणून आजच्या तरुणांनी असल्या राजकारण्यांच्या, स्वंयघोषित नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, आण्णाच्या, दादाच्या, भावाच्या, उभरत्या नेतृत्वाच्या, खंबीर नेतृत्वाच्या, तरूण तडफदार नेतृत्वाच्या नादी लागून, त्यांची चमचागिरी करून आपले भविष्य बरबाद करून घेऊ नये आणि विनाकारण कुणालाही मोठे करू नये.

अँड. के.टी.चावरे
मो.9309770054

Comments

Popular posts from this blog

भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात मोठी केस (प्रकरण) केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाला मानणाऱ्या प्रत्येकांनी ही केस वाचावी!

मित्रांनो आज आपण भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात महत्त्वाची केस म्हणजेच  केशवानंद भारती   ही केस जाणून घेणार आहोत व त्यासोबतच आपल्या भारतीय संविधानाची मुळ चौकट ( Basic Structure )  समजून घेणार आहोत. केशवानंद भारती  ही केस आपल्यापैकी बहुतांश जणांना माहिती असेल किंवा असं सुद्धा होऊ शकते की काही कारणांमुळे माहिती नसेलही.कारण आपल्या देशात कायद्याच्या बाबतीत म्हणावी तशी विशेष जनजागृती होत नाही.आपला कायदा हा अतिशय सुंदर व सर्वोच्च आहे परंतु त्याबद्दलची जागृती होताना दिसत नाही. भारतीय संविधान हे जगात श्रेष्ठ आहे ही गोष्ट सर्व जग मानते.एवढं सुंदर व परिपूर्ण संविधान जगात कुठेही नाही.परंतु हे संविधान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचं कार्य होताना दिसत नाही.संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम आतापर्यंत कोणत्याही सरकारने केलेले नाही.वस्तुतः ही सरकारचीच मुख्य व प्राथमिक जबाबदारी आहे. आज भारतामध्ये अनेक विद्यापीठे व त्याअंतर्गत येणारे हजारो सरकारी,खाजगी महाविद्यालये,शाळा,संस्था आहेत ज्यामध्ये ते भारतीय संविधानाचं,राज्यशास्त्राचं,नागरिक शास्त्राचं शिक्षण...

जाणून घ्या आपले आई-वडील आणि समाजातील जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असलेला कायदा

जाणून घ्या आपले आई-वडील आणि समाजातील जेष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी असलेला कायदा आजचा जो कायदा आहे तो प्रत्येक भारतीय जंणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.कारण समाजात आपण दररोज अनेक वेगवेगळ्या समस्या उदभवताना पाहतो व त्यावर आपल्या भारतीय न्यायपालिकेकडून अनेक प्रकारचे, वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे बनवताना पाहतो.अशाच अनेक कायद्यापैकी आणखी एक महत्त्वाचा कायदा म्हणजे  आई-वडील आणि जेष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणासाठी कायदा-2007  हा कायदा इतका सुंदर व इतका महत्त्वाचा आहे की त्याचे शब्दात वर्णन करणेच अशक्य आहे.कारण हा कायदा बनवण्या मागचा जो उद्देश आहे तो अतिशय सुंदर आहे.जसा हा कायदा बनवण्यामागचा उद्देश सुंदर आहे तशी या कायद्याची पार्श्वभूमी मात्र सुंदर नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.कारण या कायद्याची गरजच का पडली याच्या मुळाशी जर आपण गेलो तर अतिशय मन हेलावून टाकणारी पार्श्वभूमी या कायद्याची आहे.म्हणून सर्वप्रथम आपण ती पार्श्वभूमी काय आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे. हा कायदा न्यायपालिकेला का बनवावा लागला: कुठलाही कायदा हा जनतेच्या कल्याणासाठी असतो ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. ...

बौद्ध समाजातील अतिशय ज्वलंत व महत्वाच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला लावणारा तेलंगणा राज्यातील जयपाल वाघमारे या एका तरुण विचारवंताचा हा लेख प्रत्येकांनी आवर्जून वाचावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

बौद्ध समाजातील अतिशय ज्वलंत व महत्वाच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला लावणारा तेलंगणा राज्यातील जयपाल वाघमारे या एका तरुण विचारवंताचा हा लेख प्रत्येकांनी आवर्जून वाचावा.  🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ ज्यांना समाजात तथागत बुद्धाच्या व बाबासाहेबांच्या विचारांने खरचं परिवर्तन व्हावे असे वाटते त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांचा अगोदर स्वतःच्या जीवनात अंगीकार करावा मगच इतरांना ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करावा. कारण स्वतः अंगीकार न् करता केवळ इतरांना कोरडे ज्ञान सांगण्याला कवडीचाही अर्थ राहत नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण गांभीर्याने समजून घेणे व यावर निष्पक्षपणे चर्चा होणे ही काळाची गरज आहे. 📘📗📕📙📘📗📕📕📘📗📕📙📘 तथागत बुद्धांच्या व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की, या दोन्ही महामानवांनी आपल्या ज्ञानाने, आपल्या कार्याने संपूर्ण जगावर प्रभाव पाडला. जगाच्या कानाकोपऱ्यात बुद्धविचार पोहचला व बाबासाहेबांचा विचारही आज झपाट्याने जगात पुढे जात आहे. या दोन्ही महामानवांकडे...